किल्ले वासोटा



वासोटा




किल्ल्याची उंची : ४२६७फूट
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग
डोंगररांगः महाबळेश्र्वर कोयना
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्‍यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे 'किल्ले वासोटा'. ज्ञानेश्र्वरीत वासोटाचा
अर्थ 'आश्रयस्थान' असा दिला आहे. वासोटालाच 'व्याघ्रगड' असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या
दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.

इतिहास : वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत 'वसिष्ठ' हे नाव अपभ्रंश होऊन 'वासोटा' झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत 'वसंतगड' या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोटा बखरीवरून शिवरायांनी जावळी
विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले
शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला
येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला

दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोटावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍या दरवाजाने गडावर प्रवेश करता येतो. समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्रावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट 'काळकाईच्या ठाण्याकडे' जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाटाची आठवण येते. याच माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. मारुतीच्या देवळाच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते.या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबुकडापाशी येऊन पोहोचते. या कडाचा आकार इंग्रजी 'ण' अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडाची आठवण येते. समोरच उभा असणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच 'जुना वासोटा' होय. जुना वासोटा नव्या वासोटाच्या बाबुकडावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्र्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात
नाही.
गडावर जाण्याच्या वाटा : वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्र्वरमार्गेआणि दुसरा थेट वासोटाकडे.सातारामार्गेवासोटा :१) कुसापूर मार्गे- सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सकाळी ९ वाजता सातार्‍याहून बसची सोय आहे. येथून कुसापूरला कोयना
धरणाचा जलाशय लाँचने पार करून जाता येते. कुसापूरहून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ
मैलांवरील नागेश्र्वराकडे नेते तर डावीकडे जाणारी वाट वासोटावर घेऊन जाते. २) खिरकंडी मार्गे- सातार्‍याहून बसने 'वाघाली
देवाची' या गावी यावे. येथून लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर वाडी पासून जाणारी

वाट 'मेट इंदवली' या गावात घेऊन जाते. सातार्‍याहून इथवरचा प्रवास आठ-नऊ तासांचा आहे. येथून पुढे पाच-सहा तासात
वासोटावर जाता येते.
३) महाबळेश्र्वर मार्गे-महाबळेश्र्वरहून 'तापोळे' गावी येऊन लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून वासोटा गाठावे.
चिपळूणहून वासोटा : १) चिपळूणहून स. ८.३० वाजताच्या बसने 'चोरवणे' या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात वासोटाला
पोहोचता येते. या मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर
एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्र्वर कडे तर उजवीकडची वाट वासोटाला जाते. येथे नागेश्र्वराकडे
जाणार्‍या वाटेने थोडे पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात विहिरीकडे जाते. येथून वासोटाचे अंतर दोन तासात कापता येते.
२) चिपळूणहून 'तिवरे' या गावी यावे. येथून रेडे घाटाने वासोटाला जाता येते.
नागेश्र्वरमार्गेवासोटा : नागेश्र्वरला भेट दिल्याशिवाय वासोटाची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोटावर जाताना समोरच एक
सुळका आपले लक्ष वेधून घेतो. त्यालाच नागेश्र्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे.
हजारो नागरिक दर शिवरात्रीला या पवित्र स्थानी दर्शनास येतात. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक
शिवलिंगावर होत असतो. बहुतेक ट्रेकर्स प्रथम नागेश्र्वराचे दर्शन घेऊन मग वासोटाला जातात. त्यासाठी फक्त लांबचा पल्ला
चालण्याची तयारी असावी लागते.

राहण्याची सोय : १) पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोटावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते. २) नव्या वासोटावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
३) नागेश्र्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.जेवणाची

सोय : आपण स्वतःच करावी.

पाण्याची सोय : नागेश्र्वराच्या गुहेकडे जातांना, पायर्‍यांच्या उजवीकडून जंगलात जाणारी वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते. नव्या वासोटावरही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ : कुसापूर मार्गे- ४ तास, चोरवणे मार्गे- ७ तास

सूचना : वासोटाला पावसाळ्यात जाताना जळवांचा मोठा प्रमाणावर त्रास होतो. तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी. चिपळूणहून चोरवणे मार्गेवासोटाला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही. तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब