अजिंक्यतारा


अजिंक्यतारा

किल्ल्याची उंची : ३०० मीटर
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः सातारा
जिल्हा : सातारा
श्रेणी : सोपी

अजिंक्यतारा हा किल्ला 'सातारचा' किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट म्हणजे एका किल्ल्यावरून दुसर्‍या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांची सरासरी उंची कमीच आहे. अजिंक्यतार्‍याची उंची साधारणतः: ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे.


इतिहास : सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले. मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वतः:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्‍या शाहुच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते.या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात कशातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्र्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणतः दीड तास लागतो.

गडावर जाण्याच्या वाटा : अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस. टी. स्थानकावरून अदालत वाडा मार्गेजाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० - १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाडापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाडाच्या बाजूने जाणार्‍या थेट वाटेने आपण गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागतो व येथून गाडी रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर आपण थेट दरवाज्यापाशी पोहचतो.अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गेगड गाठण्यास साधारण १ तास लागतो.

राहण्याची सोय : गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात.

जेवणाची सोय : जेवणाची व्यवस्था आपणच स्वतः करावी.

पाण्याची सोय : उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : साधारणतः: १ तास(सातार्‍यापासून)

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६