अशेरीगड
किल्ल्याची उंची : १६८० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पालघर
जिल्हा : ठाणे
श्रेणी : मध्यम
पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात 'दादा' वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने हा
गड बुलंद वाटतो.
इतिहास : अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे.त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षेआहे असे अनुमान निघते. पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली. पेशव्यांनी १७३७ च्या कोकणमोहिमेत हा गड जिंकून घेतला व १८१८ नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पठारावर व उजवीकडे पडक्या वाडांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा पावसाळ्यात पावसाचे पाणी किंवा सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणार्या वार्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकर्यांना झोपण्यासाठी 'बर्थ' केलेले आहेत. गावकर्यांकडून येथे कधीतरी पूजा होत असावी असे वाटणारी व एरवी सहसा न आढळणारी दोन जास्वंदीची झाडे गुहेच्या तोंडाशी आहेत. गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफही दिसते. याशिवाय आणखी दोन पण अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्रेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड ाला गेलेली मोठी भेग व पुढे एक
बांधीव बुरूज दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणार्या एस. टी. बसने किंवा या महामार्गावरून धावणार्या खाजगी वाहनाने निघून 'मस्तान नाका' या ठिकाणापासून सुमारे १० - ११ किमी वर असणार्या 'खोडकोना' गावाच्या स्टॉपला उतरायचे. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामार्गावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात. विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून गावकर्यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायचं. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणतः खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतात.
वाट इथपर्यंत सोपी पण चढणीची आहे. खिंडीत थोडा वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठा खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाई करणे योग्य.
शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे. इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायर्या खोदलेल्या आहेत. वाटेत खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यावरूनच दुतर्फा खांद्यापर्यंतउंच झुडूपांतून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिने खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी टाकी आहेत. या टाक्यांतील अतिशय सुंदर पाणी आहे. जवळच खडकात एक गुहा देखील आहे.
राहण्याची सोय : १० ते १२ माणसे गुहेत व बाहेरच्या बांधीव कट्टांवर राहू शकतात. परंतु उंदरांपासून सामानाची काळजी घ्यावी.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास
सूचना : पावसाळ्यात प्रस्तरारोहण धोक्याचे ठरू शकते.
Comments
Post a Comment