पुन्हा तिळगुळ गोड लागलेच नाही

निदान मराठी माणसाने तरी हा दिवस विसरू नये।
आजकाल आपण सहज क्षुल्लक कारणास्तव " पनिपत झाले " ही संज्ञा वापरतो। सिनेमा - सिरिअल्स मधून " बचेंगे तो और भी लढेंगे" ही विद्युल्लता "विनोद' म्हणून निर्लज्जपणे वापरत असतो। इतिहासाच्या वास्तवतेचे भान असावे म्हणून हा प्रयत्न।




"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"



आज संक्रांत. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.

दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,

" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"


आपला
थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,

"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"


कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.


रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड
बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला
देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !



* पानिपतचा समरप्रसंग *


* १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.

* युद्धाची सुरवात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान झाली. गारदीच्या तोफा गरजल्या व समोर रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पठाणांवर प्रभाव पडला नाही.


* गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले व बर्खुदारखानाचा निभाव लागेना व त्यांचे हजारोंनी सैनिक मरून पडले. गारदीमागे दमाजी गायकवाड व विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले. मात्र, जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.

* त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्ध लागले. मराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलो, असे वाटू लागले.


* दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढला. तोफखाना बंद पडून इब्राहिम खान जखमी.


* याचवेळी एक गोळी विश्‍वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले. भाऊसाहेब घोड्यावरून दुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.


* विश्‍वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर व शिंदे मागून रणांगण सोडून मार्ग काढीत दिल्लीकडे निघाले. भाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.


* दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले. भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविले. पठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नाना फडणीसाने पाहिले.


* सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश्‍य झाले. युद्धात व युद्धानंतर एकूण ८० हजार ते १ लाख मराठे मारले गेले.

पानिपतचा समरप्रसंग (दैनिक सकाळ)



त्या योध्यांची आठवण ठेवताच सण साजरा करा

Comments

  1. Anonymous00:23

    "कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
    तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

    ReplyDelete
  2. Mitra.. Buradi ghatachi ladhai 14 jan 1761 la zali nahi.. ti 10 jan 1760 la zali.. ethe dattaji shindyanna virmaran ale.. jankoji shinde ghayal zale.. tyanantar mahinabharane hi khabar punyaparyant geli.. mag bhau nighale.. ani panipat chi tisri ani mukhyahat chi ladhai ji 'panipat chi ladhai' mhanun samajli jate ti 14 jan 1761 la zali.. tya adhi shukratal chi ani buradi ghatchi ladhai barobar ek varsh pahile zali.. ya ek varshat dilli ne khup kahi sosle ahe.. pan panipat chya ladhai ne afganyancha kana modla.. :)

    ReplyDelete
  3. Mahadji Shinde aani Vinchurkar yanni jar Ibrahim Khan Gardyache aikun Golachi Ladhai Khelali Asti tar Aapan Panipat kadhich harlo nasto. Aajche chitr kahi vegalech aste.

    ReplyDelete
  4. Good too see you all had read 'Panipat' ... brave history of maratha :)

    Santosh, tase jar vhayche aste tar jar Malhararao holkarani velich najeeb khanala paathishi ghatle naste tar hi vel aalich nasti aani raghunath peshwayani yogya veli Najeeb khanala maarle aste aani Panipat kadhi ghadlech naste ... but point to be noted ... Panipat jar ghadle naste tar Marathyanchi Shaurya Gatha kadhi gaayli geli nasti ... aapan harlo nakki but haarun pan jinklo :)

    ReplyDelete
  5. हृदय भरून आले एकदम असेच स्वराज्यासाठी लढलेले काही मावळे ..त्यांचे योगदान अमूल्य आहे हे विसरून चालणार नाही .....जगदंब !!जगदंब !! ..जय भवानी !!!!!

    ReplyDelete
  6. Very Nice blog very well written , I have also written a book on Panipat this is the facebook page of the book
    https://www.facebook.com/pages/Third-Battle-of-Panipat/265170066922810

    U can find many marathi articles on these topic on this page

    ReplyDelete
  7. १० जानेवारी १७६० .... महाराष्ट्रात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदानं साजरा केला जात होता. तिळगुळ वाटले जात होते, गुळाच्या पोळ्यांच्या पंक्ती उठत होत्या. त्याचवेळि तिथे उत्तरेत, दिल्ली वाचवताना कामी आलेला दत्ताजी बहाद्दराचा बिन मुंडक्याचा मुडदा, बुराडि घाटावर यमुनेच्या वाळवंटात भडाग्नि घेत होता. जव्हेरगंजाच्या पाठीवर सोन्या-चांदिच्या अंबारीत मिरवणार्‍या "शिंदे स्वारीच्या" नशिबी साधा मंत्राग्नी सुध्दा नसावा ह्याहुन दुर्दैव ते काय???

    वाट्टेल त्या किंमतीवर दिल्ली शत्रुच्या ताब्यात पडू देणार नाही ह्या चिरडिने, स्वकियांनीच निमंत्रणांच्या अक्षता धाडुन बोलावलेल्या अब्दालीच्या परचक्राची पहीली लाट शिंद्यांच्या लष्कराने आपल्या छातीवर झेलली होती. अफगाणिस्थान आणि महाराष्ट्र दिल्लीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते.

    राष्ट्रावर अघोरी संकट आलं होतं, युध्दातील पहिली आहुती पडली होती. इतिहासपुरुषाची पाऊले पानिपताकडे पडायला सुरुवात झाली होती. इतिहासाचा प्रवास युध्दाकडून युध्दाकडे सुरु झाला होता.

    - सौरभ वैशंपायन

    ReplyDelete
  8. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
    तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥

    - १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात, रुपयोंकी गिनती नही|"
    पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे, "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
    म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
    आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
    - सौरभ वैशंपायन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब