जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी. (कोंडाजी फर्जंद)


महाराज रायगडावर आपल्या काही महत्त्वाच्या सवंगड्यांबरोबर बोलत बसले होते. सुदैवाने या त्यांच्या बैठकीची तारीखही सापडली आहे. हा दिवस होता ६ जानेवारी १६७२ .
तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गडकोट कब्जात झाले. दौलत वाढली. परंतु एक सल मनात राहिलाय. माझा पन्हाळगड अद्यापपावेतो मिळाला नाही. पन्हाळा म्हणजे दख्खनचा दरवाजाच. आपल्याला पन्हाळगड पाहिजे. पन्हाळ्याचा दुरावा जीवी सोसवत नाही. '

समोरच्या खेळगड्यांशी बोलता बोलता ते पटकन बोलून गेले ,'कोण घेतो पन्हाळा?कोण?कोण?

हा अचानक पडलेला सवाल समोरच्या साऱ्याच शिलेदारांनी छातीवर झेलला. पुढे बसलेल्यातील मोत्याजी मामा खळेकर म्हणाले,महाराज, मला सांगा. मी घेतो पन्हाळा. अन् असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यात होते गणोजी , अण्णाजी दत्तो , आणखीन कुणी कुणी. अन् एक मर्दानी मनगटाचा मराठा गडी. म्यानातून तलवार सपकन् बाहेर पडावी , तसा जबाब त्याच्या तोंडून बाहेर पडला.अन् तो म्हणाला, 'महाराज, म्या घेतो पन्हाळा. माझ्यावर सोपवा. आत्ताच निघतो.पन्हाळा घेतलाच समजा. '

या आशयाचे बोलणे सहज बसलेल्या बैठकीत निघाले अन् जागच्याजागी आपोआपच अग्निहोत्र शिलगांव, पेटावं अन् फुलावं तसा मराठी अग्नी पेटला. या समशेरीच्या पात्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद.

कोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले. अन् तो म्हणाला , ' पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. '


महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली अन् काय सांगावं , मराठी मनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , 'किती सैन्य हवं तुला ?' बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ? महाराजांनी दि. 16 जाने. 1666 ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो ? म्हणजे याचा हा विचार की अविचार!

विचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.

कोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत!

याचा काय अर्थ असावा ? महाराजांना नक्की असं वाटलं असावं का ? मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं , मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवर गेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.

भरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.

कोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे 70 कि.मी.

कोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की , शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.

असा आहे पन्हाळा

' भेदे करोन ' पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पण पुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.

अन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. 6 मार्च 1673) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.

फाल्गुन वद्य 13 ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय ?

शिवचरित्रमाला भाग १०८ - बाबासाहेब पुरंदरे

ऐन मध्यरात्रीत गडावर एकच कापाकापी उडाली प्रचंड आवेशाने कोंडाजी लढत होता. दिसेल त्याची कत्तल करीत कोंडाजी पुढे सरकत होता. अचानक कोंडाजी आणि किल्लेदार बाबुखान हे आमनेसामने झाले .ह्या दोघांमध्ये प्रचंड युद्ध पेटले होते, दोघांमध्ये प्रचंड झटापटी झाली त्याच्या प्रहराला उत्तर काही ठिकाणी हुलकावन्या देत कोंडाजी बाबूखानवर बरसत होता अखेर कोंडाजीच्या एका भयंकर तडाख्यानिशी बाबूखानचे मस्तक धडावेगळे झाले. किल्लेदार पडला म्हणजे किल्लाच .
जे शाहीसैन्य उरले होते ते आपला जीव मुठीत धरून पळत सुटले. महाराजांच्या मनातील एक सल ह्या मर्दमराठी मावळ्याने काढून टाकली होती

Comments

  1. तुमचे लेख फार छान आणि बोधक असतात. इथे सुद्धा लिहीत जाणे म्हणजे अधीक लोकांपर्यंत ज्ञान पोहोचेल - http://www.orkut.co.in/Main#CommTopics?cmm=1049771

    ReplyDelete
  2. खुप छान लेख लिहिला आहे अन संदर्भ बाबासाहेब पुरंदरे याचे आहेत म्हणजे अस्सलच आहेत.
    सुभाष खडकबाण.

    ReplyDelete
  3. Awesome Dude ........

    मराठीत कॉमेंट्स दिली असती पण तुजे लेख इतके छान असतात अन् त्यातले शब्द पण बिनचूक म्हणूनच मला शब्द सापडत नाहीयेत मराठीत तुज्या लेखाला कॉमेंट्स द्यायला ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब